कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना

कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना
कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना

कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना

मराठी बहुचर्चित कादंबरी

त्रिकोणातील वादळ पेलतांना : जगण्याचे संदर्भ देणारी कादंबरी

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या नाटकातील जगप्रसिद्ध वाक्य -‘जगावे की मरावे?’ हे आठवले. स्त्री जन्माचा आणि स्त्री शोषणाचा अनंत इतिहास या एका प्रश्नाने भरलेला दिसून येतो.
पारंपरिक मनुवादी विचारसरणीचा प्रभाव आणि परिणाम युगानुयुगे पिढ्यानपिढ्या गुलाम मानसिकतेवर आणि वैचारिक वांझ पुरुषसत्ताक विचारसरणीवर दिसून येतो. कुठल्याही प्रकारची सुधारणा दिसून येत नाही ही शोकांतिका आहे. पुरूष जरी नपुंसक किंवा मनोरूग्ण असला तरी त्याची पती म्हणून सेवा स्त्रीने करावी हा अलिखित कायदा इथल्या समाज व्यवस्थेने जन्माला घातला आहे. त्यामुळे अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत.

बुध्द, फुले, शाहु, आंबेडकर या सुधारित विचारसरणीला महिलांनी स्वीकार करत शिक्षणाचा ध्यास घेतला स्वतःच्या अस्तित्वाला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष केला. हे सर्वात मोठे दु:ख इथल्या धर्म सत्तेचे आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी स्त्रीच्या शोषणाला विरोध केला असे दिसून येत नाही.

कादंबरी हा प्रकार जीवन प्रवाहातील अनुभवांचे मूल्यमापन करत वाचकांना जगण्याचे संदर्भ देऊन जातो.
‘नियतीना सुड’ या कवितासंग्रहाच्या कवयित्री आणि ‘खानदेशी बावनकशी’ या लेखसंग्रह अशा एकूण 11 पुस्तकांच्या सुप्रसिद्ध लेखिका  म्हणून खानदेशातील लेखिका म्हणून ज्या लोकप्रिय आहेत अशा लतिका चौधरी यांची कादंबरी ‘त्रिकोणातील वादळ पेलतांना’ यातून जीवन जगण्याचे संदर्भ वाचकांना मिळतात. स्त्रीवरील कौटुंबिक अत्याचार हा नवरा या एका खंबीर नसलेल्या पात्रामुळे घडून येतो, हे विदारक वास्तव त्यांनी स्वानुभवातून अधोरेखित केले आहे.

वेलुची कथा या कादंबरी मध्ये आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून निमुटपणे त्रास सहन करणारी वेलू वैचारिक वांझ समाजातील मानसिकता आणि पुरूषी अहंकार, पुरूषी मानसिकता यांचे सुक्ष्म अवलोकन कशा प्रकारे करत जाते? कोणत्या घटना, प्रसंगाला कसे मनोधैर्य ठेवत कशा प्रकारे पुढे जाते याचे वास्तव चित्रण यात आहे.
स्वानुभवातून जे काही सोसलं भोगलं त्याचे पारदर्शक शब्द चित्रण रेखाटतांना जीवनातील चढ उताराचा आलेख लेखिका प्रसंगावधानतेने मांडत जातात.

कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना
कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना

जिद्द, इच्छाशक्ती, आशावादी दृष्टीकोन या बळावर कादंबरी पुढे जाते.
स्त्री जीवनाचे मूल्यभान जपणारी वेलुची जीवनप्रवासाची कथा पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी जन्म घेत वाचकांना अंतर्मुख करते.
प्रत्येक सजीवाच्या आत एक जीवन जगण्याची लय सामावलेली असते. जीवन जगण्याचे तत्व असते. ठामपणे भुमिका मांडणारे स्वतः चे अस्तित्व असते. संघर्ष माणसाला जिवंत ठेवतो.

कलाछंद जोपासण्याची उपजत लय, शिक्षणावरील प्रामाणिकपणे निष्ठा, विश्वास, जीवन जगण्याचा संघर्ष हे बलस्थाने कादंबरी मध्ये दिसून येतात. अत्याचार सहन करणारा अधिक दोषी मानला जातो. स्त्रीजीवनात अन्य काही पर्याय उपलब्ध करून दिले जात नाही. लग्न झाले म्हणजे फार मोठी जबाबदारी सासरी सोपविण्यात आली याचे भान सासरी नसते.

संसार सागरातील भरती आहोटीच्या लाटा स्त्रीला तिचे अस्तित्व किनाऱ्यावर पडलेल्या शंख शिंपल्यासारखे निर्जीव आहे असे दाखवून जातात. नियती सातत्याने स्त्री जीवना समोर आव्हाने घेऊन उभी असते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता स्त्री पुढे जाऊ शकते हे वेलूच्या जगण्यातून दिसून येते.

कादंबरीची भाषा, स्वानुभवातून स्वयंप्रेरणेने लेखन आणि वाचकांसोबत संवाद साधत समाज मानसिकतेवर आघात करणारी वैचारिक वांझ समाजाचा पुरूषी मानसिकतेवर प्रतिकार करणारी वेलू असा साहित्य जीवनाचा आरसा या कादंबरीत दिसून येतो.
पंधरा ते पस्तीस या वीस वर्षातील जगावे की मरावे हा स्वानुभवातून स्वयंप्रेरणेने घडणारा प्रवास संवाद माध्यमातून वेलू वाचकांसोबत बोलत जाते.

अनुभवाची दाहकता वाचकांच्या मनावर सखोल परिणाम करणारी ठरते.
स्वयंप्रेरणेने निर्माण झालेले, स्वतः च्या उपजत क्षमतेतून दृष्टीकोनातून निर्माण झालेले साहित्य इतरांना देखील जीवन जगण्यासाठी संदर्भ देऊन जाते.

स्त्रीत्वाचे जगणे भीषण, भयाण, परावलंबी आहे.
संसार म्हणजे फसवं मृगजळ.
संसार म्हणजे स्मशान आणि जगणं म्हणजे मरण भोग हे विदारक वास्तव या कादंबरीत मांडले आहे.
पुरूषाशिवाय जगण्याची अगतिकता आणि पुरूषाविना जगतांना समाजाच्या डोळ्यात दिसणारी घृणा अशा दुहेरी पेचात अडकलेल्या वेलूला शिक्षणामुळे पर्याय मिळतो.

अनुभवाचं प्रचंड भांडार आणि प्राजंळपणे व्यक्त होण्याचं सामर्थ्य घेऊन वेलू वाचकांसमोर उभी राहते.
प्रा. बी. एन. चौधरी यांची प्रस्तावना सदरहू कादंबरीला मिळाली आहे.
होरपळून निघालेलं मन एकाकी होते. कधी नैराश्येकडे जाऊन देह यातना संपवू पाहतं, तर कधी सुरवंटासारखं धडपडत, फरफटत स्वतःला मोकळं करू पाहतं, स्वतः चं आकाश शोधू लागतं. अशा वेळी एकेक प्रसंग भुईचक्रासारखे फिरत राहतात.
(पृ.१९)

स्वतःच्या दु:खातून स्वतःला बाहेर काढण्याची कला उपजत स्त्रीमध्ये दिसून येते.
-‘ही दु:ख, संकटं, नियती, दुर्दैव, अपयश, पराजय, बदनामी, अफवा, अनिष्टतेची भूतभोवरी साध्या केसालाही धक्का लावू शकत नाही माणसाच्या. कुठलीही लाट प्रचंड नसते माणसाच्या धैर्यापेक्षा, मजबुतीपेक्षा मजबुत असं काही नसतं. असावी फक्त खुमारी जगण्याची, जगवण्याची! असावी फक्त इच्छाशक्ती भरारीची!!!’
(पृ.२०)

लेखिकेचे वाक्य भाषाशैली वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ठरतात.
स्त्रीच्या भावनांचे शेकडो वेळा तुकडे केले तरी देखील ती स्त्री पुन्हा स्वतःचे अस्तित्व कणाकणातून निर्माण करते. शुन्यातून विश्व घडवण्याची क्षमता तिला उपजत मिळालेली असते. मानसिक बळ तिला निसर्गतः खंबीर बनवत असते.
मनाची मशागत करण्याचे प्रशिक्षण स्त्री स्वतः स्वतःच्या अनुभवातून शिकत जाते.

कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देता कणखरपणे उभे राहण्याची क्षमता निसर्गतः स्त्रीमध्ये आहे.
वेलूचा पहिला नवरा सासूच्या तालावर नाचतो. बायको म्हणून तिचे दुर्लक्षित उपेक्षित अस्तित्व मनाला चटका लावुन जातं. सासूचे एकेक वाक्य ऐकून बाईच बाईची शत्रु ठरते हे मुल्यमापन दिसून येतं. ज्या घरात जोडीदार साथ देत नाही तेथे बायकोचे अस्तित्व निर्जीव ठरते शून्य ठरते हे वेलूच्या पहिल्या लग्नाच्या अनुभवातून दिसून येते.

संसार जोडण्याचा ती खूप प्रयत्न करते. स्त्रीत्वाचे अस्तित्व गुंडाळून पायाखाली ठेवले तरी देखील पुरूषी मानसिकतेवर परिणाम होत नाही हे पाहून शेवटी अशा नामर्द पतीपासून घटस्फोट हाच एकमेव पर्याय तिच्यासमोर उभा राहतो. जिवंतपणी मरण यातना वेलू सहन करते. स्त्री आहे म्हणून नाही तर एक मानवतेचा दृष्टीकोनातून देखील नवरा समजून घेत नाही. चारचौघात बायकोची बाजू घेत नाही अशा जगण्यापेक्षा मरण चांगले, अगदी जनावरागत हाल अपेष्टा सहन करून देखील नवरा संसारात लक्ष देत नाही हे कटू सत्य लेखिका स्वानुभवातून मांडत जाते.

स्वतः ची इज्जत कोणतीही स्त्री विनाकारण वेशीवर टांगत नसते.
तिच्या भावनांचा वणवा, मनावरच्या भळभळून वाहणाऱ्या जिवंत जखमांचा हिशोब, अन्यायग्रस्त आवाजाचे प्रतिउत्तर तिला समाजाकडून न्याय स्वरूपात हवे असते. जिथे पती खंबीर नसेल तेथे इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार?
कोणताही देव तिच्या मरण यातना कमी करण्यासाठी धावून येत नाही.

समाज मानसिकता तिच्यासाठी ठामपणे भूमिका बजावत नाही. मनुवादी संस्कृतीने ठरवून दिल्या प्रमाणे स्त्रीने वागले बोलले पाहिजे असा तुरूंगवास तिला मिळालेला असतो.
सौंदर्य शापित असते, सौंदर्य क्षणिक असते, सौंदर्य नश्वर असते.

हे स्त्रीला माहिती असते. तरी देखील बाह्य सौंदर्यात अडकलेला समाज वासना शांत करणारा समाज मृगजळामागे धावणारी भ्रमात जगणारी पुरूषी मानसिकता आणि कालांतराने त्यातून निर्माण होणाऱ्या मनोरूग्णांची संख्या समाजात वाढत आहे हे अनेक अनुभवातून भोवताली दिसून येते. स्त्रीचा आक्रोश, तिचे दु:ख, तिची मानसिकता हे कोणी समजून घेत नाही. तिचे अस्तित्व पतीसोबत जोडले जाते. ज्या बाईचा पती खंबीर नाही तिचे अस्तित्व शून्य मानले जाते. पती जिवंत असून सोबत नाही आणि पती मरणानंतर देखील स्त्रीला दोष दिला जातो. ही मानसिकता स्त्रीला सुखाने जगू देत नाही.

नियोजन आणि निर्णय क्षमतेचा अधिकार स्त्रीला दिला जात नाही हे सत्य अनुभवातून कादंबरी पुढे जाते. खान्देशातील भाषेचा गंध या कादंबरीत आहे.
माझी बायको चोवीस तास घरात बंदिस्त असावी. कोंबडी डालून ठेवतात तशी ही मनोवृत्ती प्राणघातक ठरते. अशा मनोवृत्ती ला किड लागलेले झाड म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
वाळवी लागलेले झाड ज्याप्रमाणे निर्जीव ठरते त्याप्रमाणे वासनेची वाळवी लागलेले मन माणसाला पोकळ करून टाकते. संशयामुळे जीव घेण्याची किंवा स्वतः चा जीव देण्याची क्षमता मनोरूग्ण व्यक्तीमध्ये निर्माण होते.

संशयाची वाळवी लागलेले मन पुरुषात विकृत मानसिकता निर्माण करते.
स्त्रीचे शरीर माझे आहे. स्त्रीच्या मनावर माझा अधिकार आहे. स्त्रीचे अस्तित्व माझ्यामुळे आहे. या भ्रमात जगणारी पुरूषी मानसिकता मनोरूग्ण वाढवणारी आहे.
युगानुयुगे आपण भाकडकथा ऐकतो आणि त्यांचा आदर्श घेऊन जगतो. रामाने सीतेला अग्निपरीक्षा देण्यासाठी सांगितले. रामाने सीतेला वनवासात सोडले म्हणून प्रत्यक्ष जीवनात पुरूष कसाही वागला बोलला तरी श्रेष्ठ मानायचे. स्वतः च्या अस्तित्वासाठी संघर्ष करू नये ही वैचारिक वांझ समाजाची कुबुध्दी आहे.

संघर्ष श्रेष्ठ ठरतो. संघर्षातून पर्याय शोधत वेलू पुढे जाते.
स्त्रीचे शरीर म्हणजे काचेचे भांडे तिला बोलण्याचे स्वातंत्र्य नाही.
मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य नाही.
जिवंतपणी नरकयातना देण्याचा परवाना पुरूषी मानसिकतेने काढलेला आहे.
मनावर आघात करणाऱ्या शब्दांना व्यक्त करण्याचे सामर्थ्य, क्षमता, कुवत प्रगटीकरणाचे मनोधैर्य म्हणजे सृजनशीलता होय.
स्त्री जन्माच्या वाट्याला आलेला भोग आणि वेदना त्यांचा केंद्रबिंदू असला तरी जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हेच त्याचं बलस्थान आहे. काळ बदलला तरी अत्याचाराचे स्वरूप काळानुसार बदलत आहे हे नमूद करावे लागेल.

वसतीगृह सुपरिटेंडट म्हणून नोकरी, खाजगी शिकवण्या विधुर वकीलाशी नोंदणी विवाह पुन्हा अपमानाच्या दलदलीत फसलेली वेलू वाचकांना अंतर्मुख करते.
प्राध्यापक म्हणून नोकरी सोडून पश्चाताप करणारी वेलू, पतीला मानसिक आधार देणारी वेलू, स्वतःचे भविष्य स्वतः घडवणारी वेलू असे अनेक तेजस्वी रूपे स्त्री अस्तित्वाचे कादंबरीत दिसून येतात.
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य वेलूच्या खंबीर भूमिकेतून दिसून येते.

वादळात सापडलेली संसार नौका स्वतः च्या मनोधैर्याने स्वतः होकायंत्र बनून ती किनाऱ्यावर घेऊन येते हा आदर्श आणि अनुकरण या कादंबरीतून मिळतो. जीवन कसे जगावे याचे सखोल मार्गदर्शन यातून मिळते.
आत्मनिर्भर नसलेल्या अनेक सुशिक्षित मुली अजून देखील पतीच्या मानसिक स्वातंत्र्य न देण्याच्या निर्णयामुळे अस्तित्व गमावून बसतात.
बौध्दिक वैचारिक पातळी या कादंबरीत उंचावते. नैतिकतेच्या आधारावर वेलू प्रश्नांचे उत्तर देते.

चौफेर दृष्टीकोनातून विश्लेषण, नात्यांची खोलवर केलेली चिकित्सा, व्यापक सर्वसमावेशक दृष्टीकोनातून मांडणी, स्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारी पुरूषप्रधान संस्कृती हे गुणविशेष कादंबरीत दिसून येतात. स्त्रीच्या दृष्टीकोनातून आयुष्य म्हणजे जिवंत विचारांचा ज्वालामुखी तो शिक्षणाने जागृत होतो हे बलस्थानं कादंबरीत दिसून येतात.
नरकयातना देणाऱ्या वैचारिक वांझ समाजाची मानसिकता वेलू उघडपणे जाहिर करते. पुरूषी मानसिकतेविरूध्द संघर्ष त्यात वेलू यशस्वी ठरते.

माझं जीवन माझं आहे.
माझं स्वामित्व मला गमवायचं नाही.
माझा जीवन सागर मला माझ्याच मनाच्या कुपीत बंद करून ठेवायचा
कुणालाच माझ्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार नाही.
माझा जीवनवृक्ष मी फुलवेन
त्याला नवजीवन नव संजीवनी देईन.

स्वतःच्या ज्ञानाची ऊर्जा स्वतः निर्माण करणारी संघर्ष शक्ती, तेजोमय किरणांचा खळखळाट शिक्षणामुळे निर्माण झाला.
शिक्षण हाच सर्वश्रेष्ठ पर्याय स्त्री जीवनाचा ठरतो हे वेलू सिध्द करते.
सतत मारहाण शिवीगाळ यामुळे कोवळ्या वयात त्रासलेली वेलू, मर्यादा कशी ठेवावी याचे भान असणारी वेलू, आईवडिलांच्या अब्रुला धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेणारी वेलू ,

मरण देखील पती घरचे यावे असे मानून जगणारी वेलू, अंधश्रद्धा न मानणारी वेलू, शिक्षणाचा ध्यास घेणारी वेलू स्वतःचे आयुष्य संपवू पाहणारी वेलू, मनोरूग्ण नवरा स्वीकारणारी वेलू, असे अनेक रूपे यात दिसून येतात.
ज्या बाईचा नवरा भक्कम असेल तिलाच मानसन्मान मिळतो. स्त्री सबळ असली समर्थ असली विचाराने निर्णयाने परिपूर्ण असली,  कितीही उंचीवर गेली तरी जर नवऱ्याची बाजू नसेल नवऱ्याचे  सुख नसेल, नवराच किंमत करत नसेल तर तिच्याजवळ सर्व काही असूनही ती नातीगोती समाज यांच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षित असते, हेच सत्य सहवासातल्या अशा बायका पाहिल्या की त्यांना धड दोन गोष्टींचे ज्ञान नको, घरकाम नको, विचार व्यवहार नको, जन्माला बाई म्हणून आलेल्या पण बाईपणाचा थोडासा अंश नसलेल्या स्त्रिया पाहून वेलू आश्चर्य चकित होते.

संसाराचे फसवे मृगजळ वेलूच्या स्त्रीत्वाला अधिक कणखर करून गेले.
कुणीतरी म्हटलयं की प्रेम हे धरणीसारखं असते. त्यात आधी दाणा पेरावा लागतो. -‘माझं प्रेम, माझा त्याग, माझी सोशिकता, सहनशीलता, कर्तव्य, जीवन, जगणं असं सारं वाझं भूमीवर पेरलं जात होतं. देवानं असं वाळवंट भाळी मारलं होतं. पण तरीही वाळवंटाचे नंदनवन करण्याची क्षमता आणि महत्वाकांक्षा बाळगणारी मी चिवट जातीची, चिवट रक्ताची, भक्कम मजबुत हाडामासांची मी हार थोडीच मानणार होते?

हरणं आणि माघार हे शब्दच माझ्या जीवनाच्या शब्दकोशात नाहीत.’
लेखिकेचे वाक्ये वाचकांच्या मनाला अधिक संवेदनशील करतात.
‘भोगापेक्षा त्यागात दिव्य भव्य असं सुख असतं हे स्वतः आत्मीय सुखानुभव अनुभवत होते.
मनाचा आवाका व्यापक झाला होता.

आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय या त्रिवेणी संगमानं जीवनाचा झरा जलद वाहत जातो.
संशयखोर माणसाला सुख लाभत नाही व तो त्याच्या सहवासातल्या व्यक्तींनाही सुख लाभू देत नाही’  हे सत्य अनुभव लेखिकेने ठामपणे मांडले आहेत.
-‘त्रिकोणातलं वादळ पेलता पेलता तडा गेलेल्या हृदयाला सांधलं.
पहिलं अल्पवयातलं नवरा नावाचं लोढणं अल्पायुषी ठरलं.
दुसरं सज्ञानपणातलं अज्ञान बाहुलं पदरी पडलं. लोकांची पर्वा करणं हेवा, असूया, टिंगलटवाळी करणं हे कधी स्वभावातचं आलं नाही. स्वतः शी स्पर्धा करत राहायची. अन्याय पचवत, कुढत विधायकाकडे वाटचाल करावी.

वैवाहिक जीवन जगतांना फक्त आणि फक्त नवऱ्याच्या ओठांवर च्या हास्याला अन् शब्दांच्या कौतुकाला तरसले.
समाज नजरेनं मी नवऱ्याशिवाय अपुर्ण असल्याची जाणीव करून दिली.
स्त्रीला कुठलीही जात, धर्म, पंथ, वर्ग नाही. स्त्री जात हीच तीची जात.
स्त्री दास्य, तिला दिली जाणारी वागणुक, तिच्याबद्दल चे समज- गैरसमज, वारंवार होणारी अवहेलना, तिला भोगावे लागणारे शारीरिक मानसिक दु:ख, बाईपणाच्या यमयातना हे जगभर प्रचलित अस वास्तवं.

कितीही आक्रोश केला तरी तिचं सारं तत्व आत्मसन्मान अस्मिता गाडण्याचाच प्रयत्न होतो. हेच सत्य कागदावर, व्यासपीठावर भाषणातली आदरणीय वंदनीय पूजनीय स्त्री ही क्षणार्धात मादी होते.’
स्त्री क्षणाची पत्नी अनंत काळाची माता ही व्याख्या आता बदललेली आहे.
स्त्रीच्या जीवनातील आवर्तने पुर्ण करण्यासाठी पुरुषाची नवरा म्हणून शारीरिक मानसिक जबाबदारी सदरच्या कादंबरीचा केंद्रबिंदू ठरतो. स्त्रीच्या दृष्टीकोनातून स्त्रीचे जीवन ‘जगावे की मरावे’ या स्वरूपात दिसून येते.

प्रत्येक वेळी स्त्रीला तडजोड करावी लागते. वैचारिक वांझ समाजाचा एक भाग म्हणजे पुरूषी मानसिकता आहे. ही मानसिकता कधीही समता प्रदान करू शकत नाही. मराठी साहित्य विश्वात नव्या बदलासाठी ‘त्रिकोणातील वादळ पेलतांना’ या कादंबरीचा अभ्यास करणे अपरिहार्य, अनिवार्य ठरते. स्त्री जाणिवेतून स्त्री आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारे पाऊल अनेक स्त्रियांसाठी अनुकरणीय आणि आदर्श ठरणारे असे आहे.

अशा कादंबरीचा समावेश महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असला पाहिजे. बदलत्या काळानुसार प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व करणारे साहित्य म्हणून सदरच्या कादंबरीचा उल्लेख करता येईल.
लेखिकेच्या लेखनाला अनेक शुभेच्छा देते.

त्रिकोणातील वादळ पेलताना मराठी बहुचर्चित कादंबरी-

मूल्य- 350+50″= 400/₹

समीक्षण-
प्रज्ञा हंसराज बागुल
दिग्रस जि. यवतमाळ

एसटी बस प्रवासातील विचित्र अनुभव