स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट
खरं खरं सांगते… ठरवून फक्त आणि फक्त चांगलं लिहिणार होते. शुल्लक त्रुटी, खटकलेल्या किरकोळ गोष्टी असतील तर पूर्णतः दुर्लक्ष करायचं असं ठरवून…
पण… एखाद्या निःपक्षपाती समिक्षकाला सुद्धा या सिनेमाला 5 स्टार द्यावे लागतील असा सिनेमा बनला आहे.
सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या कामांचा, विचारांचा आवाका बघता तीन तासात त्याला न्याय देणे हे शिवधनुष्य आहे… जे हा स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट सिनेमा तोलून धरतो.
सगळ्यात आधी सावरकर नावाचा हिरो साकारण्यासाठी रणदीप हुडा ला 100 पैकी 100 मार्क्स तरुणपणीचे रुबाबदार सावरकर ते म्हातारपणीचे काटक तरीही कणखर सावरकर हे स्थित्यंतर आणि मधल्या प्रत्येक प्रसंगातले सावरकर साकारण्यात हुडा कमालीचा यशस्वी झाला आहे.
चित्रपटाची धाटणी वेगळी असल्याने त्याच्याशी जुळवून घ्यायला 10-15 मिनिटं जातात पण पुढचे 3 तास सिनेमा आपल्याला पकडून ठेवतो.
सावरकर लंडन ला जातात तिथून सिनेमा उत्तरोत्तर चांगलाच झाला आहे.
सावरकरांची सुरुवातीची ठळक कार्ये
1857 च्या उठावाला पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं रूप देणं
अखंड भारत ही संकल्पना
गांधी सावारकर यांच्यातील पाहिली भेट
आपल्या मनावर ठसविण्यात चित्रपट यशस्वी होतो
सागरा प्राण तळमळला ही कविता कुठलीही चाल न लावता ऐकवण्याचे आणि किनाऱ्यावर बसलेले सावरकर दाखवण्या पेक्षा लाटांमध्ये बसून शोक करणारे सावरकर दाखवण्याचे ज्याला सुचले त्याची कमाल. या अशा अनेक प्रसंगांतून सावरकरांचं पोलादी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभं होत जातं.
सावरकरांच्या जीवनात कितीही दुःख, कठीण प्रसंग आले तरी चित्रपट बघताना माझ्यासारखी भावनाशील व्यक्ती पण भावनिक झाली नाही याला कारण समोर उभी केलेली सावरकरांची या सगळ्याला टक्कर देणारी आणि तितकीच कणखर प्रतिमा.
अंदमानात गेल्यावरची घराच्यांबरोबरची निरोपाची भेट आणि 9 वर्षांनी जेल मध्ये दोन भावांचं भेटणं मात्र हळवं करून जातं.
सावरकरांना जेल मध्ये टाकण्याचा इंग्रजांना झालेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ‘टिळकांनंतर गांधी देशाचा नेता होणे’ हे सिनेमा खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित करतो.
गांधींची राम राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणि सिनेमातसुद्धा विनोदी वाटते
जेल मध्ये सावरकरांना दिसणारी हिंदू मुस्लिम फूट, बाहेर गांधींचं मुळमुळीत नेतृत्व आणि आत जन्म घेणारं सावरकरांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाची व्याख्या लोकांपर्यंत थेट येऊन पोहोचते हे सिनेमाचं यश आहे.
अंदमानातून सुटताना गर्दीच्या कोलाहलाच्या अपेक्षेत असणाऱ्या आपल्याला, समोर फक्त बाबाराव घ्यायला आलेले दिसणं हे चटका लाऊन जातं. सावरकरांची उपेक्षा सुद्धा हा सिनेमा ठळकपणे दाखवतो आणि त्यामुळे सावरकरांचा कणखरपणा आणि निरेपेक्ष वृत्ती अजूनच झळाळून येते.
गांधी हत्या ते सावरकरांना अटक अशा प्रत्येक घटनेला हा सिनेमा शेवटपर्यंत न्याय देतो आणि शेवटपर्यंत सावरकरांचा रुबाब टिकवून ठेवतो.
सावरकरांच्या कवी मनाला हा सिनेमा कुठेच हात घालत नाही…तरीही तो इतका आकर्षक आहे. अगदी शेवटी सुद्धा सावरकरांची कुठलीही कविता न घेता, एक मराठी रॅप साँग घातलं आहे.
पण त्यामुळेच सावरकरांची ती बाजू देखील किती सुंदर आहे याची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. त्यावर आधारित एक वेगळी कलाकृती काढता येईल इतका तो विषय मोठा आहे.
तो माणूसच इतका मोठा आहे की कुठल्याही एका कलाकृतीत त्याला बांधणे शक्य नाही.
तरीही हा सिनेमा करता येईल तेवढा… होता होईल तेवढा उत्कृष्ठ झाला आहे.
कालचा माझा दिवस सत्कारणी लागला.
– श्रेया कुलकर्णी