मराठामार्ग “महाराष्ट्र दिन विशेषांक” मे 2025 मध्ये डॉ.निर्मला पाटील यांचा प्रकाशित झालेला लेख
ऊस तोडणी कामगारांच्या समस्या व उपाय
आपल्या जीवनात आणि जेवणात साखरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही यशानंतर, आनंदाच्या बातमीनंतर किंवा शुभ कार्यामध्ये साखर वाटून तो आनंद साजरा केला जातो. पण स्फटिका प्रमाणे शुभ्र असणारी साखर ज्या ऊसापासून तयार होते तो ऊस शेतातून साखर कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना अनेक अडचणीतून, यातना आणि वेदनातून जावे लागते. गोड साखरेची कटू कहाणी बऱ्याच जणांना माहित नाही. ऊस तोडणी कामगार म्हणजे जेथे ऊस मोठ्या प्रमाणात लावला आहे, त्या शेतात जाऊन तो तोडून /कापून साखर कारखान्यापर्यंत पोहोचविणारा कामगार वर्ग.हा स्थलांतरित मजुरांचा मोठा समूह आहे. आज महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये उसाची शेती केली जाते. राज्यातील एकूण 200 साखर कारखान्यापैकी 192 साखर कारखाने सुरू आहेत. 11 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. साखर कारखानदारी महाराष्ट्रामध्ये आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा आणि कळीचा भाग मानला जातो. राज्यातील अर्थकारण, राजकारण या भोवती फिरत आहे. या शेतीच्या जोरावर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी बागायतदार झाला आणि पुढे कारखानदार. शेती प्रगत झाली आणि पश्चिम महाराष्ट्र सधन झाला. पण या सर्वांमध्ये मात्र ऊस तोडणी कामगार गरीब, दुर्लक्षित, उपेक्षितच राहिला. ऊस तोडणीचे काम हे अत्यंत कष्टाचे, जोखीमीचे तर आहेच पण या कामाला प्रतिष्ठा नाही. आणि कष्टाच्या प्रमाणात मोबदलाही मिळत नाही. ऊस तोडून कारखान्यापर्यंत आणण्याची जबाबदारी ही कारखान्यांची आहे. पण या कामासाठी कारखान्यांना स्थानिक मजूर मिळेनात म्हणून हे मजूर आणण्यासाठी कारखानदारांनी मुकादम नेमले. मुकादम मागास व दुष्काळी भागातून हे मजूर गोळा करून आणू लागले. बालाघाट डोंगराचा पट्टा, मराठवाड्यातील सर्व जिल्हे विशेषतः बीड जिल्ह्यातून हे शेतमजूर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होऊ लागले. कोरडवाहू जमिनीचा शेतकरी, भूमिहीन शेतकरी,अल्पभूधारक आज पिढ्यानपिढ्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस तोडणी कामगार म्हणून राबत आहे. प्रामुख्याने हे मजूर कुणबी, मराठा, वंजारी, माळी, दलित, आदिवासी, बंजारा समाजाचे आहेत. ज्या भागात पुरेसे पाणी नाही, पुरेसे पीक येत नाही अशा मजुरांसाठी ऊस पिक ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची संधी आहे. साधारण दहा ते बारा लाख ऊस तोडणी कामगार दरवर्षी स्थलांतरित होतात.दिवाळीनंतर ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यामध्ये हे ऊस तोडणी कामगार पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. येताना संसाराला लागणाऱ्या मोजक्या वस्तू, धान्य घेऊन येतात. जिथे पडीक जागा मिळेल तिथे झोपड्या (पालवे )उभ्या केले जातात आणि पुढील पाच सहा महिने याच झोपडीत त्यांचा संसार थाटला जातो. एका तळावर साधारण 20 ते 24 लोक राहतात. त्याला टोळी म्हणतात. एका टोळीमध्ये जितकी पुरुषांची संख्या तितकीच स्त्रियांची संख्या असते. एका कोयत्या मागे एक पुरुष आणि एक स्त्री असते. अक्षर ओळख असण्या इतके शिक्षण, आर्थिक आणि बौद्धिक मागासलेपणा असले, तरी प्रचंड शारीरिक कष्ट करण्याची ऊस तोडणी कामगारांची तयारी असते. त्यांचा दिवस पहाटेच्या अंधारात सुरू होतो आणि संपतोही अंधारातच. पुरुषाप्रमाणे स्त्रिया ही प्रचंड मेहनती असतात.कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्या ऊसाच्या फडात जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पुरुष पहाटे उठून आवरून ऊस तोडण्याच्या कामावर जातात. महिला स्वतःचे आवरून स्वयंपाक, धुणी -भांडी, मुलांचे आवरून आठ वाजेपर्यंत जेवण आणि मुलांना घेऊन फडात जातात. एक ट्रक किंवा दोन ट्रॉली भरेल इतका ऊस पुरुषांनी तोडून ठेवलेला असतो. या उसाच्या मोळ्या बांधण्याचे काम या महिला करतात. एका मोळीचे वजन साधारण 40 ते 45 किलो इतके असते. ही मोळी दोन्ही बाजूला बांधण्यासाठी दोन वेळा उचलावी लागते. दुपारपर्यंत या मोळ्या बांधून झाल्या की दोन पुरुष या मोळ्या उचलून तिच्या डोक्यावर ठेवतात. ही मोळी वाहनापर्यंत शेतातल्या ओबडधोबड वाटेवरून त्या घेऊन जातात. वाहनाला लावलेल्या एका शिडीवरून त्या वर चढतात.तेथे वाहनातील पुरुष ती मोळी वाहनात टाकतात आणि ती दुसऱ्या शिडीवरून खाली उतरते.चढताना थोडे जरी लक्ष विचलित झाले तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता जास्त असते.कधीकधी उसाचे वजन जास्त भरण्यासाठी शेतकरी ऊस तोडण्याच्या आधी एक दोन दिवस ऊसाला पाणी देतात. अशा चिखलाच्या शेतातून या महिला मोळी डोक्यावर घेऊन कसरत करीत वाहनापर्यंत जातात. ते वाहन भरायला साधारण दोन ते अडीच तास लागतात. कधी कधी मध्यरात्रीही वाहन ऊस भरण्यासाठी येते. तेव्हा त्यांना मुलांना सोबत घेऊन शेतात जावे लागते. मुलांना कुठेतरी झोपवून ऊस भरण्याचे काम करावे लागते. अशी झोपलेली मुले वाहनाखाली येऊन मृत्यू पावल्याच्या घटनाही वाचनात येतात. रात्रीच्या वेळी चिखलातून अशी जोखीमीचे कामे करणे किती धोकादायक आहे याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. ऊस तोडणी कामगार अशी कामे वर्षातील जवळजवळ सात ते आठ महिने करतात. यादरम्यान हिवाळाही येतो. यावेळी तर त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडते. ज्या ठिकाणी पालवे असतात ती जागा गावाबाहेर, उघड्या माळावर असते.त्या ठिकाणी स्वच्छ पाणी, वीज,बाथरूम संडासची योग्य पद्धतीने सोयी केलेली नसते. या कुटुंबासोबत त्यांची जनावरे ही असतात. अस्वच्छतेमुळे त्या ठिकाणी डास, मुंग्या इतर किड्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. स्वयंपाक ही चुलीवर करावा लागतो. या चुलीच्या धुरामुळे श्वसनाचे आजार उद्भवतात . प्रतिकूल परिस्थितीमुळे, पोटासाठी, पैशासाठी त्यांना अशा परिस्थितीत अनेक तडजोडी करून राहावे लागते. शाळेत जाणारी मोठी मुले गावाकडेच असतात. पण लहान मुले त्यांच्या आई-वडिलांसोबत अशा ठिकाणी राहत असतात. 8-10 वर्षांच्या अनेक लहान मुलांना शिक्षण घ्यायचे असते, वेगळा काम धंदा त्यांना करायचा असतो,पण परिस्थितीमुळे ती शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहतात आणि ऊस तोडणीच्या कामाला लागतात. अशा मुलांना अर्धा कोयता म्हणतात आणि त्यांना मजुरी ही अर्धी मिळते. गावाकडे काम नाही,पैसा नाही आणि मुकादम ही उचल देतो त्यामुळे ऊस तोडणी हा त्यांचा पिढ्यानपिढ्याचा धंदा बनला आहे. रात्री -अपरात्री ऊस भरण्यासाठी गाडी येते किंवा पहाटे लवकर उठून ऊस तोडणीच्या कामावर जावे लागते. ऊस तोडणी कामगारांची झोप पूर्ण होत नाही. झोप येऊ नये म्हणून त्यांना तंबाखू खाण्याची सवय लागते आणि या कामगारांना नंतर तंबाखूचे व्यसन लागते. यातून पुढे बिडी, सिगारेट, मद्याचे आणि जुगाराचेही बऱ्याच कामगारांना व्यसन लागते. आणि अशा ऊस तोडणी कामगारांचा बराच पैसा हा त्यांच्या व्यसनावर खर्च होत आहे. आणि त्यांचा संसार उघड्यावर पडण्याची वेळ येते. ही गोष्ट लक्षात आल्यावर मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये नवरा बायको दोघेही समोर असल्याशिवाय मुकादम पैसे देत नाहीत. अस्वच्छता,सकस आहाराची कमतरता,शारीरिक कष्ट, वेळेवर झोप नाही यामुळे फिट येणे, उन्हाळ्याच्या त्रासामुळे चक्कर मळमळ, उलटी, थकवा हे आजार विशेषतः लहान मुलांच्या मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. अंगदुखी, अंगाची खाज येणे, हाताला घट्टे पडणे, जखमा होणे या लक्षणांचे प्रमाण या ऊस तोडणी कामगारांमध्ये जास्त आढळून येते. ऊस तोडण्यासाठी एक कामगार दहा सेकंदात साधारणता चार वेळा वागतो सहा महिन्यात 20,16000वेळा. यामुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये कंबर दुखी हा आजार सर्रास आढळून येतो. पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा थोडं जास्तच काम करणाऱ्या ऊस तोडणी कामगार स्त्रियांना अर्धा कोयता म्हटले जाते. या कामगार स्त्रियांच्या व्यथा, वेदना खूप गंभीर आहेत. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.दगडाच्या चुलीवर पालापाचोळा पेटवून स्वयंपाक करावा लागतो. या महिलांना झोपडी बाहेर दोन-तीन दगड ठेवून त्यावर बसून भल्या पहाटे अंधारात उघड्यावर आंघोळ करावी लागते. त्या अंगावर साडी ठेवूनच आंघोळ करतात यामुळे शरीराची स्वच्छता होत नाही, फक्त अंग ओले होते. सात-आठ महिने या महिला अशाच पद्धतीने राहतात. मासिक पाळीच्या काळात जास्त स्वच्छतेची गरज असते पण या काळात ही स्वच्छता राखली जात नाही. शिवाय त्यांना विश्रांती,सकस आहार मिळत नाही याचे खूप गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. अगदी कमी वयामध्ये म्हणजेच साधारण वयाच्या 15 ते 17 वर्षा दरम्यान मुलींचे विवाह होतात. आणि लगेच तिला ऊस तोडणी साठी घेऊन जातात.ज्या कुटुंबामध्ये जास्त ऊस तोडणी कामगार त्या कुटुंबाला उचल ही जास्त मिळते.मुकादम लग्नासाठी आवर्जून उचल देतो म्हणजे त्यांना एक कोयता जास्त मिळतो. वयाच्या 23 -24 वर्षांपर्यंत या मुलींना दोन-तीन मुलेही होतात. पण लहान वयातील लग्न, गर्भधारणा, सकस आहाराचा- स्वच्छतेचा अभाव यामुळे त्यांना ऐन पंचवीशित गर्भाशयाच्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अगदी लहान वयात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा धोका सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते.ऊस तोडणी कामगारांना कोणत्याही गंभीर आजाराशिवाय सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तिचे गर्भाशयच काढून टाकले जाते. गर्भधारणेपासून आणि मासिक पाळी पासून तिची सुटका होते आणि अशा रीतीने ती कायमची ऊस तोडणी कामगार बनते. ऊस तोडणीच्या हंगामाच्या सुरुवातीच्या काळात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषता बीड जिल्ह्यात गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची दिसून येते कारण गरोदर महिलांना ऊस तोडणी कामगार म्हणून घेऊन जाणे हे खूप धोक्याचे आणि न परवडणारे आहे. लहान मुलांना संभाळण्यासाठी या लहान मुलांची मोठी भावंडे ही या कामगारांसोबत स्थलांतरित होतात.लहान मुलांना सांभाळण्यासाठी स्थलांतरित झालेली बालके ही बहुतांशी मुलीच असतात. अशी जवळजवळ तीन ते चार लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. या मुलींना आपल्या लहान भावंडांना संभाळत घरातील कामेही करावी लागतात. लहान भावंडांना सोबत घेऊन जवळच्या गावातून दळप दळून आणणे, पाणवठ्यावर किंवा नदी -ओढ्याला जाऊन धुणी धुणे अशी कामे या लहान मुली करतात. त्यांच्या डोक्यावर दळपाचे किंवा कपड्याचे ओझे न पेलवणारे असते आणि हाताला ते लहान भावंड असते. आदिवासी किंवा बंजारा समाजातील लहान मुले नदी नाल्यावर जाऊन खेकडे, मासे पकडतात. नासमज असणाऱ्या अशा मुलांच्या जीविताला धोकाही निर्माण होत आहे. ऊस तोडणी कामगारांचा सर्वे होत नाही.सरकार दप्तरी त्यांची नोंद नाही. महाराष्ट्रात 13 ते 14 लाख ऊस तोडणी कामगार वेठबिगारी कायद्यानुसार वेठबिगार आहेत. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. आई-वडील सहा सात महिन्यांसाठी स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्या मूळ गावी लहान मुले एकटी राहू शकत नाहीत. ज्या गावांमध्ये ऊसतोड असते त्या गावातील शाळांमध्ये वेळेत पोहोचवणे आणि शाळा सुटल्यावर वेळेत आणण्यासाठी जाणे आई बापाला शक्य नसते. झोपडी मध्ये कोणाच्या भरवशावर मुलांना सोडायचे हाही एक प्रश्न आहे. कारखाना परिसरात काही ठिकाणी साखर शाळा सुरू केलेल्या आहेत पण प्रतिसाद फारसा मिळत नाही. या कुटुंबांना राहण्यासाठी स्वच्छ ठिकाण, स्वच्छ पाणी, शौचालय,वीज, सकस आहार पुरवण्याची जबाबदारी कारखान्याने किंवा सरकारने घेणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, आजारांचे प्रमाण कमी होईल. त्यांच्यासाठी काही ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. पण त्यांना या काळात योग्य वेळी, योग्य आरोग्य सेवा पुरविणे, मोफत किंवा माफक किमतीत औषध पुरवठा करणे, सरकारी दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर औषध उपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. या ओळखपत्राचा उपयोग त्यांना सरकारी धान्य दुकानातील धान्य मिळण्यासाठी ही झाला तर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही सुटू शकतो. पुरुषांमधील व्यसनाधीनता, महिलांमधील अंधश्रद्धा यातून हे कामगार मुक्त होऊन एक त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, आनंदी, उत्साही, सकारात्मक बनविण्यासाठी योग्य व्यक्तीकडून त्यांना वारंवार मार्गदर्शन करणे, त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यांना वर्तमान जगाची ओळख होणे आणि काल सुसंगत बदल त्यांच्यामध्ये घडवून आणणे हेही गरजेचे आहे. ऊस तोडणी कामगारांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य स्थिर- सुरक्षित करण्यासाठी, त्यांचे आयुष्यमान उंचावून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हा एक आशेचा किरण आहे. या मंडळाच्या वतीने त्यांना ओळखपत्र देण्यात येऊ लागले आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, नुकसान भरपाई इत्यादी योजनांचा लाभ मिळू शकतो. तसेच एक देश रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी करणे, आरोग्य शिबिरे राबविणे, पाणीपुरवठा, स्वच्छता यांची सोय करणे, मुलांसाठी साखर शाळा सुरू करणे, शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी सकस आहाराची किंवा अंगणवाडीमध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देण्याची अंमलबजावणी करणे, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे, मजुरांच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई देण्याची सोय यासाठी या महामंडळाचे काम गतीने होणे गरजेचे आहे. कारखान्यांनी याचा पाठपुरावा केला तर निश्चित या कामाला गती येईल . आजचे युग हे ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, एआय चे आहे. भविष्यामध्ये ऊस तोडणी व तोडलेला ऊस वाहनात भरण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा सर्रास वापर होऊ लागला तर या लाखो ऊस तोडणी कामगारांचे भविष्य काय असणार आहे? यासाठीही पर्यायी व्यवस्था तयार असली पाहिजे. ऊस तोडणी कामगार सुद्धा माणसेच आहेत आणि त्यांनाही इतरांसारखा आनंदाने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. गरज आहे त्यांनी झालेला बदल स्वीकार करून काळासोबत चालण्याची.
— डॉ निर्मला पाटील. ( सांगली) राष्ट्रीय अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड.
9822725678