मराठी कथा डिटॅचमेंट

मराठी कथा डिटॅचमेंट
मराठी कथा डिटॅचमेंट

मराठी कथा डिटॅचमेंट

रोजचाच दिवस , रोजचीच सकाळ ,  तीच धावपळ , तोच दिनक्रम . पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता . पण तो  माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता .जीवनाची खर्‍या अर्थानं सुरूवात होती ..माझ्या शिक्षणाचं , मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं . रोज उठून रोजगाराच्या जाहीराती पाहणं , अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता . अर्ज , लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून ( BSRB ) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते.

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो , तो आनंद मला मिळाला होता .बँकेत लेटर घेऊन जाणे , अधिकार्‍यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर  कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे , सगळं अद् भूत होतं माझ्यासाठी . आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हीस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता .

इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते.

आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती . उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता . रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या मला एकदम रितेपण जाणवणार होतं .दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार , या वेळेचं नियोजन कसं करणार .? या प्रश्नांनी वेढली होते .

” मॅडम आता कोठे घेऊ गाडी , मला रस्ता सांगा ” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या ” . रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं . आँटोरिक्षा , टॅक्सीवाल्याँचा आज संप होता . बँकेत वेळेवर पोहोचणं , डे बेगीन करणं , कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं , वेळेवर होणं गरजेचं होतं . रस्त्यावरून जाणार्‍या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले .

सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं , आरामात उठायचं , वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा . आरामात आंघोळीला जायचं . किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ?. पण रोजच्या धावपळीत , दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही . सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया , मी मनाशी खूणगांठ बांधलेली .आज ती वेळ आली होती , पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले , ते ही नेहमीपेक्षा लवकर . वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत .

स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला , ” अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले . डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं . ” इतकी वर्ष सोबत निभावलीस . माझ्यासोबत तू ही रिटायर झालास . तू ही अलिप्त झालास . डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते .डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती . असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं .

तुळशीने मंजिर्‍या खूप धरल्या होत्या . ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं . म्हणून मंजिर्‍या वरचेवर खुडाव्यात , तुळशी पुन्हा बहरायला मदत होते ” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्‍या खुडू लागले .देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्‍या वाहिल्या . 

दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते , तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही . हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा , मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते . 

हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द ,

यांनी नवऊर्जा दिलीच की
हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .

आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी “

तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।


म्हणताबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहु,णी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहीणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते “


या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता .

” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “
सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास
. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .


नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

” होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लीत झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

डाॅ.शैलजा करोडे ©
नेरुळ नवी मुंबई
मो.9764808391

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *