तुला काय झालंय रे?
आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगत असताना आपल्या आजुबाजूला असणारी माणसंही त्यांच्या पद्धतीनं त्यांची आयुष्यं जगत असावीत असं समजून आपण त्यांची फारशी विचारपूस करीत नाहीत. सध्याच्या धावपळीच्या युगात जगत असताना आपल्याला यात काहीही वावगं वाटत नाही. शहरी वातावरणात कुणी कुणाच्या अध्यात-मध्यात नसतं. हे शहरांचं एक मोठं आणि महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. आता ग्रामीण भागातही हा शहरी संस्कार चांगलाच रुजू लागला आहे.
माणसं पूर्वीसारखी एकमेकांना आवर्जून भेटत नाहीत. चुकून येता-जाता भेटलीच, तर हाय-हॅलोच्या पलिकडे बोलत नाहीत. एकमेकांच्या ख्याली-खुशालीबद्दल कुणालाच काही पडलेलं नसतं. एकीकडे आपलं यश आणि प्रतिष्ठा गोंजारीत त्याचं जमेल तेवढं प्रदर्शन करण्यात प्रत्येकजण मशगूल असतो. दुसरीकडे समोरचा प्रत्येक माणूस जणू आपला स्पर्धक आहे असं समजून माणसं आपलं वैयक्तिक आयुष्य जमेल तेवढं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. ही खरंतर तारेवरची कसरत असते; पण माणसं ती अथकपणे करीत असतात. अगदी सख्ख्या भावंडामध्येही ही परिस्थिती बदलत नाही. उलट तिथं त्याची तीव्रता अधिक आढळते.
माणूस ऑनलाईन दिसला की झालं. त्याचं ऑनलाईन असणं हा त्याच्या ख्याली-खुशालीचा पुरावा समजला जाण्याचा काळ आता सुरु झाला आहे. म्हणूनच सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरु आहे असं समजून स्वतःचं आयुष्य बिनधास्त आणि मस्तवालपणे जगणारी अनेक माणसं आपल्याला आपल्या अवती-भवती दिसत असतात. अशा माणसांना समाजऋणाचं भान उरलेलं नसतं. दुसरीकडे अडचणीत असलेली माणसंही आमचं सगळं छान चाललंय असं दाखवण्यासाठी खोट्या आणि बेगडी प्रतिष्ठेचा बुरखा घालून वावरत असतात. आपली अडचण कुणालाही कळु नये यासाठी त्यांचा आटापिटा अविरतपणे सुरु असतो. आपण अडचणीत आहोत हे जगाला कळू नये असं माणसांना का वाटत असावं? हे खरं तर अजब म्हणावं असं एक कोडं आहे. आम्ही सुखात आहोत, आमचं सगळं छान चाललं आहे. इतरांच्या तुलनेत आम्ही कुठंही कमी नाहीत. हे दर्शवण्याचा दुराग्रही अट्टाहास यामागं दडलेला असतो. अशा रितीनं माणसं दोन्ही बाजूंनी चुका करीत राहतात आणि त्यातून त्यांच्यातला संवाद हरवत जातो.
खरंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनानं माणसा-माणसांतलं भौतिक अंतर पुष्कळसं कमी झालं आहे. त्यामुळं संवादातला स्थळ-काळाचा अडथळा आता पूर्वीसारखा राहीलेला नाही. असं असुनही माणसांच्या अंतरांतलं अंतर मात्र याच विकसित तंत्रज्ञानामुळं प्रचंड वाढत गेलं आहे. हे वास्तव आपणास दुर्लक्षित करता येणार नाही. हजारो कि.मी. वर वास्तव्याला असणाऱ्या माणसांशी आपल्याला काही क्षणात संपर्क साधता येतो. बातम्यांची देवघेव करता येते. मात्र हाताच्या अंतरावर बसलेल्या आपल्या शेजारच्या माणसाशी आपला संपर्क होत नाही. आपणच हा संपर्क होऊ देत नाहीत असं म्हटलं तर ते अधिक योग्य ठरेल.
माणसांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. याचं कारण त्यांची माणसांवरची श्रध्दा नष्ट झाली आहे. माणसांच्या मनातील दया, माया, करुणा, सहानुभूति आणि समानुभूति या गोष्टी लोप पावल्या आहेत. त्यामुळं त्यातून निर्माण होणारं एकमेकांविषयीचं प्रेम, आस्था आणि आपुलकी हे सारंच खूप दुर्मिळ झालं आहे. त्यामुळं एखादा माणूस कामाला जातोय, घरी परत येतोय, फोनला रिप्लाय देतोय, फेसबुक-इन्स्टावर दिसतोय, कधी समोर आलाच, तर हलकंसं स्माईलही देतोय; म्हणजे त्याचं सगळं नीट चाललेलं आहे असंच इतरांना वाटत असतं. म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेतून त्याचं सगळं नीट चाललेलं असतं. पण… त्याच्या मनाच्या आत मात्र सतत एक कोलाहल सुरु असतो, ज्याची कुणालाच जाणीव होत नाही!
एखाद्या वेळी मन इतकं थकतं की फक्त शांत बसून राहावंसं वाटतं. काही बोलावंसं वाटत नाही. कधी कधी कुणाला तरी आपल्या मनातलं सारं काही सांगून टाकावं असंही खूप वाटत राहतं; पण असं मनमोकळं बोलायला विश्वासाची एक जागाही मिळत नाही. कधी कधी आपण खूप रडावं, अगदी टाहो फोडावा असंही वाटतं; पण प्रत्यक्षात तसं होत नाही. बेगडी प्रतिष्ठा आडवी येते. त्याने आपली कमजोरी जगासमोर येईल. जग आपल्याला कमकुवत समजेल. त्याने आपली प्रतिमा खराब होईल या भीतीनं माणसं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत राहतात. “नाराजी, निराशा, उदासीनता हे मनाचे तुम्ही करीत असलेले लाड आहेत. डिप्रेशन वगैरे काही नसतं.” असं थेटपणे सुनावणारी कोरडी व रुक्ष माणसं भोवताली असतील तर परिस्थिती आणखी बिघडत जाते. “ओम दुर्लक्षाय नमः” असं म्हणत आपलं मन मारून जगण्याचा सल्ला बिनदिक्कतपणे दिला जातो. असा सल्ला देताना मनाचं आरोग्य अक्षम्यपणे दुर्लक्षित केलं जातं. आपल्या मनातल्या भावनांशी निकरानं लढण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करून त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं अधिक सोपं आणि श्रेयस्कर असतं; पण हा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांशिवाय इतर कुणीच देत नाहीत!
एखादा माणूस आपल्या मनातल्या कोलाहलाने खचून न जाण्याच्या प्रयत्नात अबोल होऊन जातो. त्याचा हा अबोला नीट समजून न घेताच भोवतालची माणसं त्याला अहंकारी समजू लागतात. त्याचा अबोला हा त्याचा इगो मानला जातो. “तो आता खूप बदललाय!” असं म्हणत त्याच्या मुळातच अस्तित्वात नसलेल्या फुगीर स्वभावाची चर्चा सुरु होते. अशावेळी तो अबोल झालेला माणूस आणखी एकटा पडतो. खरंतर अशावेळी त्याला विश्वासार्ह सोबतीची खरी गरज असते. मनातल्या भावनांचा निचरा होईल इतकं मनमोकळं रडता येईल असा भक्कम खांदा त्याला मिळणं आवश्यक असतं. असा एखादा भक्कम खांदा शोधून तो रडायचा प्रयत्न करतो तेव्हा आपले सामाजिक संकेत त्याला असं करु देत नाहीत! त्याला कमकुवत समजलं जातं. म्हणून त्याचं रडणंही अर्धवट राहातं. आधीच अबोल झालेली ही माणसं इतरांच्या नजरेत कमकुवत ठरू लागली की मग मात्र ती माणसं कुणाच्याच खांद्याचा आधार घेणं टाळू लागतात. परिणामी ही माणसं एकटी पडतात.
खरंतर आपल्याला मिळालेलं आयुष्य खूप सुंदर आहे; पण त्याचवेळी ते खूप अनिश्चित आहे. ते लहान असेल की मोठं? ते छान असेल की घाण? ते आराम असेल की हराम? अशा अनेक गोष्टींचा उलगडा अखेरपर्यंत होत नाही. आयुष्याचे उतार-चढाव सुरु राहातात. कुणी एखाद्या उतारावर घसरून पडतं तर कुणाची एखाद्या चढावाने दमछाक होते. कोणतीच परिस्थिती कायम रहात नाही! निसर्ग नियमानुसार परिस्थिती सतत बदलत राहाते; पण त्या-त्या वेळच्या वेदनांचे वळ मात्र मनावर कायमचे व्रण ठेवून असतात. नुसत्या सुविचाराने किंवा सकारात्मक कृतीने जगणं पैलतीराला नेता येत नाही! कधी कधी आपलीच माणसं आपल्या स्वप्नांची माती करतात, तर कधी परिस्थिती आपला तडाखा मारते! कधी वेळ आपली नसते तर कधी आपलीच स्वप्नं आपल्याशी दगाबाजी करतात!
निसर्ग व नियतीचं विधीलिखित आणि मानवी इच्छा व त्याच्या प्रयत्नांची दिशा यांचा मेळ बसला तरच आपलं हे आयुष्य खूप सुंदर ठरतं. अन्यथा आपलं आयुष्य केवळ भेसूर म्हणता येईल असंच राहातं. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणं अबोल झालेल्या, एकट्या पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यातल्या किमान एखाद्याला आपण हटकून विचारायला हवं- “तुला काय झालंय रे?” कदाचित आपल्या त्या प्रश्नानं तो बोलायला लागेल अन् त्याची हरवलेली जीवनवाट त्याला गवसून जाईल!
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: 9766668295
Posted inमराठी ब्लॉग (Marathi Blog)
तुला काय झालंय रे?
