आखाजीची झोक्यावरची गाणी

आखाजीची झोक्यावरची गाणी

आखाजीची झोक्यावरची गाणी

खान्देश हा स्कंददेश, कान्हदेश, कानबाई चा देश, कान्हाचा देश म्हणून खान्देश असा प्रचलित झाला.

खान्देशाला विविध सण, व्रत, उत्सव यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. पुरुषप्रधान भारतीय परंपरेत भारतीय स्त्री ही चूल, मूल यात गुरफटून राहिली. विविध बंधनकारक रितीरिवाजामुळे ती केवळ कठपुतळी म्हणून जगत राहिली. आणि तिचे दुःख, वेदना, सल, खंत गाण्यातून, ओव्यातून व्यक्त करत राहिली.

खान्देशातील आखाजी

खान्देशातील आखाजी म्हणजेच अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण. पूर्वी भारतीय स्त्रीला खासकरून दिवाळी व आखाजी या वर्षातून येणाऱ्या दोन सणांना माहेरी येण्याची, मोकळा श्वास घेण्याची, मुक्तपणे जगण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळत असे. चैत्र महिन्यात मुली महिनाभर गौराईची  टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत, विविध खाद्यपदार्थ नैवेद्य अर्पण करत साजरा केला जाई.

आखाजीच्या एक दिवस आधी मुली वाजत गाजत, गाणी म्हणत, हळदी ने पिवळा केलेला पंचा, फेटा, दक्षिणा घेऊन कुंभाराकडे शंकर घ्यायला जात. संध्याकाळी दूध, शेवया, सांजोऱ्यांचा नैवेद्य देत.

आखाजीच्या दिवशी पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात, कुरडया,पापड,भजे यांचा नैवेद्य देत. आजही देतात. 

संध्याकाळी दोन्ही गावच्या मुली सीमेवर जमून टिपऱ्या वाजवत, गाणी म्हणत भांडण करून घरी येत.

आखाजीची झोक्यावरची गाणी
आखाजीची झोक्यावरची गाणी

आखाजीची गाणी

दिवसा माहेरी आलेल्या मुली झोक्यावरची गाणी म्हणत. ती गाणी समाज, प्रांत, तेथील परंपरा, भौगोलिक वातावरण, कुटुंब याची महती दर्शवितात.
गाण्यातून भारतीय स्त्रीच्या विविध भावनांना मोकळी वाट करून मिळते.
उदा-


1)तापी काढनी चिकनी माटी
माटी लेवाले जाऊ वं माय
आशी माटी चांगली ते
वट्टा तरी लीपू वं माय
………..घटया मांडू, गहू दऊ, सांजोऱ्या
बनावू
या गाण्यातून तापी नदी, तेथील माती महत्त्व, घर स्वच्छता, तेथे जे धान्य पिकते त्याने विविध पक्वान्ने बनविण्याची प्रथा, श्रद्धा दिसून येते.


2) चैत्र वैशाखनं ऊन वं माय,
    खडके तपून झाली लाल वं माय,
   आईच्या पायाला आले फोड वं माय….
वरील गाण्यातून वैशाख महिना, तप्त वातावरण, तरी मुलीची माहेरी येण्याची तीव्र ओढ
या भावना दिसून येतात.


3)  आथानी कैरी तथानी कैरी
      कैरी झोका खाय वं
      कैरी तुटनी, खडक फुटना
     झुय झुय पानी व्हाय वं


वरील गाण्यातून स्त्रीचे सासर माहेर येणे जाणे, तेथील भावनांची, जगण्याची आंदोलने स्पष्ट होतात. बापाला प्रसंगी खडकासारखे कठोर व्हावे लागते. रडून चालत नाही. पण कैरी तुटणे म्हणजे पोटच्या मुलीचे माहेर सोडून सासरी जाण्याने बाप मन, भावनेने तुटतो. त्याच्या काळजाला पाझर फुटतो ह्या भावना व्यक्त होतात.



झुय झुय पानी व्हाय तठे रतन धोबी
धोय वं
रतन धोबी धोय तठे कसाना बजार वं
….पाटल्यास्ना बजार वं…
माय माले पाटल्या ली ठेवजो
बंधूना हाते दि धाडजो,
बंधू मना सोनाना

वरील गाण्यातून-
तेथील बाजार, प्राचीन दागिने, मुलीची अपेक्षा, भावाबद्दल प्रेम अशा विविध भावनांचे दर्शन होते.
आज काळ बदलला. रीतिरिवाज बदलले.
माणूस बदलला. स्वभाव, वृत्ती, विचार बदलले.आज विज्ञानयुगात जग जवळ आले. मोबाईलमुळे सतत संवाद, संपर्क असल्याने, सासुरवास नसल्याने ह्या भावनांची जाणीव होत नाही.


असो. कालाय तस्मै नमः ।

आखाजीची झोक्यावरची गाणी


            लतिका चौधरी दोंडाईचा

ज्येष्ठ लेखिका, कवियत्री,लतिकाताई चौधरी यांनी खूप साध्या,सरळ,सोप्या शब्दात आपल्या खान्देशातील अखाजीचे गाणे त्याची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्सवातली ही परंपरा टिकवून ही पुढच्या पुढे संक्रमित कारणे किती महत्वाची बाब आहे यावरून आपल्याला त्याच्या आशय व्यक्त होतो.