अक्षयतृतीया

अक्षयतृतीया
अक्षयतृतीया

अक्षयतृतीया

अक्षयतृतीया : शुभतेचा आणि सनातन मूल्यांचा उत्सव”
           संतोष गजानन खाडये

अक्षयतृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. ‘अक्षय’ म्हणजे ‘कधीही न संपणारे’ आणि ‘तृतीया’ म्हणजे ‘तिसरा दिवस’. हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी जे सत्कर्म केले जाते, त्याचे फल अक्षय म्हणजेच कायम टिकणारे असते, असा श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळेच या दिवशी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर अनेक शुभकृत्ये पार पाडली जातात.

पौराणिक ग्रंथांमध्ये या दिवसाला अनेक संदर्भ आहेत. महाभारतातील एक प्रसिद्ध प्रसंगानुसार, युधिष्ठिराने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ‘अक्षय पात्र’ प्राप्त केले होते. या पात्रातून कितीही अन्न काढले तरी ते संपत नसे. हा प्रसंग सूचित करतो की, या दिवशी मिळवलेले पुण्य, संपत्ती किंवा सद्गुण अक्षय राहतात. याच दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. तसेच काही पुराणांनुसार, गंगा मातेचे पृथ्वीवर आगमनही या दिवशीच झाले, असे मानले जाते.

अक्षयतृतीया विशेषतः नवीन सुरुवातीसाठी शुभ मानली जाते. व्यवसाय सुरू करणे, नवीन घरात प्रवेश करणे, नव्याने शिक्षणास आरंभ करणे, सोन्याचे दागिने खरेदी करणे, नवीन वस्त्र परिधान करणे यांसारख्या गोष्टी या दिवशी केल्या जातात. या सर्व गोष्टी शुभ फल देणाऱ्या आणि दीर्घकालीन लाभदायक ठरतात, असा विश्वास आहे.

या दिवशी सत्कर्म करण्यास विशेष महत्त्व आहे. दानधर्म, अन्नदान, गायींचे पूजन, जलसेवा, गोरगरिबांना अन्नवाटप, पाणपोई उभारणे, धार्मिक वाचन व कथा-श्रवण, हे सर्व प्रकार सात्त्विक पुण्य मिळवण्यासाठी केले जातात. महाराष्ट्रात या दिवशी महिलांकडून हळदीकुंकू कार्यक्रम, गोडधोड जेवण, व्रतपूजन आणि नवसपूर्ती यांचे आयोजन होते. उत्तर भारतात गंगा स्नान, कथा-कीर्तन, अन्नदान आणि भगवान विष्णूचे पूजन केले जाते. गुजरात व राजस्थानमध्ये सोन्याच्या खरेदीला अत्यंत शुभ मानले जाते. दक्षिण भारतातही देवी लक्ष्मीच्या पूजनाला आणि नवसाच्या पूर्ततेस विशेष महत्त्व दिले जाते.

या दिवशी विशेष करून सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी खरेदी केलेले सोने व संपत्ती कधीही नाश पावत नाही, उलट ते वाढत जाते. त्यामुळेच सोनार दुकाने, बाजारपेठा या दिवशी फुलून गेलेली दिसतात.या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा दिवस कोणतीही पंचांग सल्लामसलत न करता शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण या दिवशी विवाह, गृहप्रवेश, वास्तुपूजन, दुकान किंवा कार्यालयाचा प्रारंभ, शेतीसंबंधी कामे यांचा शुभारंभ करतात.

आजच्या आधुनिक युगात अक्षयतृतीया केवळ धार्मिक सण न राहता, तो सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचाही एक माध्यम बनत आहे. अनेक संस्था या दिवशी वृक्षारोपण, जलसंधारण प्रकल्प, अन्नदान उपक्रम, आणि सामाजिक सेवाकाम हाती घेतात. या काळात  ‘पाणी , पर्यावरण’ ’सारख्या चळवळींमुळे पाण्याच्या अमूल्यतेचे भान समाजाला आले आहे. अशा प्रकारे हा सण जीवनमूल्यांचा आणि निसर्गस्नेहाचा उत्सव बनत चालला आहे.

अक्षयतृतीया हा सण केवळ परंपरेचा भाग नाही तर धर्म, अध्यात्म, संस्कृती, समाज आणि पर्यावरण यांचे समन्वय साधणारा उत्सव आहे. तो आपल्याला स्मरण करून देतो की खरी अक्षयता ही सद्गुणांची, सद्वर्तनाची आणि सद्भावनेची असते. सोनं खरेदी करून आपण संपन्न होतो, पण दुसऱ्याला मदत करून आपण मानवी मूल्यांनी परिपूर्ण होतो. म्हणूनच, अक्षयतृतीया ही केवळ एक तारखेला किंवा तिथीला येणारी घटना नसून, एक जीवनमूल्य आहे – जे कधीच न संपणारं, ‘अक्षय’ आहे.

धन्यवाद प्रियजन!

आपणा सर्वांना अक्षय तृतीयेचा शुभेच्छा.